Pages

मराठी बोधकथा

             मराठी बोधकथा

     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
                   १. खरा मित्र

   आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी ! धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २ ३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजालापण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. हि कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.


      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 

   *माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनुष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणुसकीच्या दृष्टीने योग्य आहे.*

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●        
           
                      २. बढाई नको रे बाबा

एक माणूस फार वर्षे प्रवास करून आपल्या घरी आला व आपण परदेशात असताना काय मौजा पाहिल्या हे त्याने आपल्या शेजार्‍यापाजार्‍यांना तिखट मीठ लावून सांगितले. आणि अगदी शेवटी एक थाप ठोकून दिली की, 'मी अलकावतीला गेलो असता तेथील लोक पंधरा पंधरा हात उंच उड्या मारतात पण त्यांनी माझ्याशी पैज लावली असता माझ्याइतकी उंच उडी एकालाही मारता आली नाही.' ऐकणार्‍या कोणालाही ही गोष्ट खरी वाटली नाही. तेव्हा त्यांची खात्री करण्यासाठी तो नाना प्रकारच्या शपथा घेऊन लागला. त्या वेळी त्या लोकातील एक माणूस त्याला म्हणाला, 'अहो, अशा शपथा कशाला घेता. हातच्या कंकणाला आरसा कशाला ? या वेळी तुम्ही अलकावतीला आहात असं समजून तिथे जशी उडी मारली तशी इथंही मारून दाखवा म्हणजे झालं.' हे ऐकताच त्या बढाईखोर माणसाचे तोंड ताबडतोब बंद झाले.

तात्पर्य - आपण प्रवासात पाहिलेल्या गोष्टी फुगवून सांगण्याची काही लोकांना सवय असते, पण एखादेवेळी त्यांचेच बोलणे त्यांच्या गळ्यात येऊन त्यांची फजिती झाल्याशिवाय राहात नाही.




●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
                          ३. ●जगण्याचे भाग●

एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होत्या. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगार सारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एके दिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशा वेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, 'अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.'

 तात्पर्य :- व्यसनी माणूस काही वेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान रहात नाही.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                      ४. ●जे असेल त्यात समाधानी असावे●

          एकदा एक भुंगा गुंजारव करत फिरत होता. तेव्हा त्याला एक चिमणी म्हणाली, 'मूर्खा, तू जो एकसारखा एकच आवाज काढत बसतो तो कशासाठी? वसंतऋतूत गाणारी कोकिळा, हिरव्यागार झाडाच्या फांदीवर बसून गाणारा बुलबुल यांची बरोबरी तुला कधीतरी करता येईल का?
          तसे जमत नाही तर भिकार सूर एकसारखा काढून तू लोकांना कंटाळा का आणतोस?' भुंगा म्हणाला, 'अगं चिमणे, परमेश्‍वराने या जगात प्रत्येक व्यक्तीत निराळेपणा ठेवला आहे. वैचित्र्य असणे हा जगाचा नियम आहे, दुसर्‍याचा हेवा न करता ज्याने त्याने आपापल्या शक्तीचा उपयोग केला तर त्यात वाईट काय? जेव्हा कोकिळेचे गाणे बंद पडते किंवा बुलबुल मुका होतो तेव्हा एखाद्या सुंदर बागेत निर्जनता भासू न देण्यात माझ्या गरीबाचा उपयोग होतो.'

तात्पर्य :- सर्व मनासारखे होत नाही, तर जे असेल त्यात समाधानी असावे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                         ५.● जंगलचा राजा●

          एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्रमाणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धति ठरे ना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजार्‍यावरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्‌गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'

तात्पर्य :-आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्‍गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                    ६. ●युक्तिच सर्वश्रेष्ठ●

               नदीच्या तिरावर एक कोळी मासे धरायला गेला. फार मोठे मासे नदीत सापडतील असे त्याला वाटले नाही म्हणून त्याने मोठे जाळे बरोबर घेतले नाही. एका काठीच्या टोकाला एक बारीक दोरी बांधून गळ वर ओढू लागला, पण मासा बराच मोठा असल्याने गळ लवकर ओढला जाईना. कोळ्याने विचार केला की, गळ लवकर ओढला तर मासा आपल्या वजनाने व चळवळीने आपली बारीक दोरी तोडून पळून जाईल तेव्हा त्याने बराच वेळपर्यंत गळ पाण्यात राहू दिला व नंतर अगदी हळूहळू तो पाण्याच्या बाहेर काढला. तोपर्यंत मासा धडपड करून अगदी निर्बळ झाला होता. त्यामुळे दोरी तोडण्याची शक्ती त्यात उरली नव्हती.

तात्पर्य :-युक्तीने सर्व प्रकारच्या अडचणीतून पार पडता येते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                        ७. ●लोभी माणूस●

             एका लोभी माणसाने आपला सगळा पैसा शेतात पुरून ठेवला होता. तेथे दिवसातून दोन वेळा जाऊन त्या पुरलेल्या जागेकडे पाहून तो मोठे समाधान मानीत असे. ते त्याचे वागणे त्याच्या नोकराने पाहिले व त्याने तर्क केला की, आपला मालक या जागेकडे नेहमी पाहतो, तेव्हा तेथे काहीतरी पुरलेले असावे. रात्री त्याने तेथे जाऊन खणून पाहिले तर आत बरेच धन त्याला दिसले. ते घेऊन तो पळून गेला. दुसर्‍या दिवशी तो लोभी माणूस नेहमीप्रमाणे तेथे येऊन पाहतो तर सगळे धन चोरीला गेलेले त्याला दिसले. मग तो डोके बडवून घेत रडू लागला. तेव्हा त्याचा शेजारी त्याच्याजवळ येऊन रडण्याचे कारण विचारू लागला. लोभी माणसाने घडलेली हकीकत त्याला सांगितली. ते ऐकून शेजारी म्हणाला, 'अरे मला वाटतं की तसं तुझं काहीच गेलं नाही. आपला पैसा येथेच आहे, असं समजून तू पूर्वीप्रमाणेच या जागेकडे पहात जा म्हणजे झालं.'

तात्पर्य :-  लोभी माणसे पैसे असून दरिद्री व अशांना पैशाचा उपयोग न होता दुसरेच कोणीतरी त्याचा उपयोग करून घेतात. जवळ असलेला पैसा वापरायचा नाही तर तो चोरीला गेल्यावर शोक करण्यात काय अर्थ ?
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                                 ८. ● कोल्हा●

                     एका कोल्ह्याचे शेपूट लोखंडी सापळ्यात सापडले असता ते तोडून तो पळाला. प्रथम त्याला आनंद झाला की प्राणांवरचे शेपटीवर निभावले. पण जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्याला आपल्या लांडेपणाचे फार वाईट वाटून तो मनात म्हणाला, 'मी मेलो असतो तर बरं झालं असतं. पण ही अप्रतिष्ठा वाईट, पण जे झाले त्याला उपाय नाही. आता हेच कसं शोभवून नेलं म्हणजे झालं ! यासाठी काय बरं युक्ती करावी ?' याचा तो विचार करीत असता त्याला एक युक्ती सुचली ती अशी की आपण सर्व कोल्हे मंडळींना एकत्र जमवून सांगावे की, 'माझी शेपटी मी तोडून टाकून ही भूषणाची नवी पद्धत काढली आहे. ही चांगली आहे अन् तुम्हीसुद्धा अवश्य करावं.' मग त्याने सगळ्या कोल्ह्यांना आपल्या घरी बोलावले व आपल्या युक्तीप्रमाणे त्यांच्यापुढे भाषण दिले. तो म्हणाला, 'अहो, या शेपटीपासून काहीच फायदा नाही. आपल्याला शेपटी म्हणजे ओझंच. शेपटी तोडून टाकल्यानं एक प्रकारचं सौंदर्य येऊन शिवाय पळण्यातली अडचण दूर होते. मी ह्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे नि शेपटी तोडल्यापासून सुखी आहे. हे सुख तुम्हाला प्राप्त व्हावं असं मला वाटलं.' इतके बोलून आपले कितीजण ऐकतात हे पाहण्यासाठी तो सगळ्यांकडे पाहू लागला. इतक्यात एक म्हातारा कोल्हा त्याची लबाडी ओळखून मान वाकडी करून म्हणाला, 'अहो, पंडित महाराज, आपली हुषारी पुरे. शेपटी काढल्यामुळे तुमचं कल्याण झालं असेल, यात शंका नाही. अन् आमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्हीही आपली शेपटी कापून टाकू. तोपर्यंत तुम्ही आम्हाला आग्रह करू नये हेच बरं.'

तात्पर्य :- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपले दोष हे नसून गुण आहेत असे बरेचजण सांगतात पण शहाणे लोक त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाहीत.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                    ९. ●चांगला राजा ●

         एकदा एका तळ्यातला बेडकांना वाटले, की आपल्याला एक राजा हवा. म्हणून त्यांनी देवाकडे तशी मागणी केली. तेव्हा देवाला हसूच आले व त्याने 'हा घ्या राजा !' म्हणून एक लाकडी ओंडका तळ्यात टाकला. तो पाण्यावर पडताच पाणी उसळले. ते पाहून सगळे बेडूक घाबरले आणि बाजूला जाऊन बसले. थोड्या वेळाने पाणी शांत झाल्यावर तो ओंडका काही हालचाल करीत नाही असे पाहून त्याच्यावर चढले व उड्या मारू लागले. मग त्यांना वाटले की या राजापेक्षा दुसरा चांगला राजा हवा. तेव्हा त्यांनी देवाची प्रार्थना करून दुसरा चांगला राजा पाठवण्याची विनंती केली. देवाने एक बगळा पाठविला. त्याने बेडकांना मारून खायला सुरुवात केली. म्हणून बेडकांनी देवाकडे अजून चांगल्या राजाची मागणी केली. ते ऐकून देव म्हणाला, 'मी तुम्हांला पहिला राजा पाठवला होता तो तुम्हांला आवडला नाही. आता तुमचं कर्म तुम्हीच भोगा.'

तात्पर्य

- देवाने ज्या स्थितीत ठेवले आहे त्यात समाधानी असावे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                             १०. ●घुबड आणि टोळ ●

           एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.

तात्पर्य

- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्‍याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                           ११. ●घार व कबुतरे ●

          एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्‍या त्रासाला कबुतरे इतकी कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते, असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरात जागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य

- एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्‍या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                    १२. ● गरीबाची हेटाळणी ●

             प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले,"माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल  काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा  स्वीकार करून घ्या." जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील  एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला ," भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो." त्या पंडिताने फाटक्या  तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले,"पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे." पंडित म्हणाले ," बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो." या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.

तात्पर्य:- लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने वीस सोन्याचे लाडू दिले.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                     १३. ● अहंकारी राजाला धडा ●

         एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा न बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले व तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला व दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले व पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला व राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                      १४. ● विश्वासाला तडा ●

एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले व आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले व तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला व म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’

तात्‍पर्यः- गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                              १५. ● पोपट ●

              एका श्रीमंत माणसाजवळ एक पोपट होता. त्या पोपटास त्याने एका मोठय़ा व सुंदर पिंजर्‍यात ठेवले होते. तो त्याला चांगली फळे खायला घालीत असे. त्या पोपटाला तेथे सर्व सुखे अनुकूल होती, तरी ही तो मनात नेहमी झुरत असे. 'माझे जातभाई जसे मोकळेपणे या जंगलातून त्या जंगलात जातात अन् या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारतात. तसे मला करायला मिळाले तर किती बरे होईल.' एके दिवशी चुकून पिंर्ज‍याचे दार उघडे राहिल्याने त्या पोपटाची इच्छा पूर्ण झाली. या पिंजर्‍यातून पोपट घाईने बाहेर पडून लांबच्या आंब्याच्या झाडावर जाऊन बसला. थोड्या वेळाने त्याला भूक लागली. तेव्हा इकडे तिकडे पाहू लागला. चमचमाट, ढगांचा आवाज होऊन पाऊस पडायला लागला. त्या बिचार्‍या पोपटाचे फारच हाल झाले. अशा गोष्टीची त्याला कधीच सवय नव्हती. शेवटी पावसात भिजून व थंडीने काकडून त्याचे तेथेच प्राण गेले. मरता मरता तो म्हणाला. 'मला जर पुन्हा त्या पिंजर्‍यात जाता आले, तर त्यातून बाहेर पडण्याची मी पुन्हा इच्छा कधीही करणार नाही.'

तात्पर्य : ठेविले अनंते तैसेची राहावे. चित्ती असो द्यावे समाधान.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                        १६.● कुणाला कमी समजू नये ●

             प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.
                त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते.


तात्पर्य-कधीही कुणाला कमी समजू नये कारण कोणत्या रुपात कोण असेल याचा भरवसा नाही.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                         १७. ● लाख मोलाचा देह ●
 
          एक भिकारी भीक मागता मागता एका श्रीमंत व्यापार्‍याच्या वाडयासमोर उभा राहून भीक मागू लागला. मालकाने सेवकाला त्याला वर बोलावयाला सांगितले. सेवक बोलवायला आलेला पाहून भिकार्‍याला खूप आनंद झाला. त्याच्या मनांत आशा निर्माण झाली की, वर बोलावलं म्हणजे बरच काही देणार असेल.

      वर गेल्यावर व्यापारी म्हणाला, 'हे बघ तुला मी पाचशे रूपये देतो पण त्याबद्दल देतो पण त्याबद्दल तु मला तुझे डोळे दे'

     'छे ! छे ! हे कसं शक्य आहे ? डोळे दिले तर मी काहींच करू शकणार नाही.' भिकारी म्हणाला.

    'बरं मग असं कर हात तरी देतोस कां?' व्यापारी म्हणाला.

       अशाप्रकारे व्यापारी प्रत्येक अवयवाची किंमत वाढवत होता पण भिकारी एकही अवयव द्यायला तयार नव्हता.

       व्यापारी म्हणाला 'बघ ५००-५०० रूपये म्हटले तरी तुझ्या देहाची किंमत लाखाच्यावर झाली. एवढा लाख मोलाचा धडधाकट देह असतांना भीक कां मागतोस ? कष्ट कर पैसे मिळवं'.

  तात्पर्य:-
  लाख मोलाचा.देह आपल्याजवळ असताना आपण भिख मागु नये.
 ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
       
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

         
   

                                 ●१८. खरा मित्र ●
   
    आश्रमात राहणाऱ्या शिष्यांनी एके दिवशी आपल्या गुरूला एक प्रश्न विचारला,"गुरुजी !
      धन, कुटुंब आणि धर्म यापैकी खरा सहकारी कोण आहे? " गुरुजींनी एक कथा ऐकवली. ती पुढीलप्रमाणे - एका व्यक्तीला तीन मित्र होते, तिघांपैकी पहिला त्याला प्रिय होता. तो प्रत्येक दिवशी त्याला भेटायचा. प्रत्येक कामात त्याची सोबत करायचा. दुसऱ्या मित्राबरोबर त्याची मध्यम स्वरूपाची मैत्री होती. दुसरा मित्र २-३ दिवसातून भेटायचा आणि क्वचितच त्याच्या सोबत असायचा. तिसरा मित्राला मात्र तो २ महिन्यात एकदा भेटायचा आणि कोणत्याही कामात त्याची मदत घेत नसे. एकदा त्या व्यक्तीकडून काहीतरी चूक झाली. त्यामुळे त्याला राजदरबारात बोलावण्यात आले. तो घाबरला. त्याने पहिल्या मित्राला सांगितले व नेहमीप्रमाणे सोबत राहण्याचा आग्रह केला. मात्र त्याने सर्व गोष्ट ऐकून सोबत राहण्यास नकार दिला. कारण तो राजाशी आपले संबंध बिघडवू इच्छित नव्हता. दुसऱ्या मित्रानेही त्याला सोबत येण्याची तयारी दर्शविली पण अचानक कामाचे कारण सांगून येण्याची टाळाटाळ केली. त्या व्यक्तीने तिसऱ्या मित्राला विचारताक्षणी तो त्याच्यासोबत गेला आणि राजासमोर त्या व्यक्तीची बाजू मोठ्या धीराने व खंबीरपणे मांडली. राजाला पण ते कथन योग्य वाटल्याने त्याने त्या व्यक्तीला दोषमुक्त केले. ही कथा ऐकवून गुरुजींनी समजावले पहिला मित्र म्हणजे पैसा. ते परमप्रिय असते पण मृत्युनंतर काहीच कामी येत नाही. तर दुसरा मित्र म्हणजे कुटुंब. आपले आपले म्हणणारे शेवटी आपल्याला वेळेला उपयोगी पडत नाहीत. आणि तिसरा मित्र म्हणजे आपला धर्म, जो आपल्याला जिवंत असेपर्यंत साथ देतोच पण मृत्युनंतर ही तो एकमेव आपल्या सोबत असतो.

तात्पर्य:-
    माणसाने आपल्या वर्तनातून आपल्या मनूष्य धर्माचे पालन केले पाहिजे, जे माणूसकीच्या दृष्टिने योग्य आहे. ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


            ❃ १९. राजा आणि कुत्रा ❃
     
     एक राजा आपल्या कुत्र्यासोबत होडीतून जात होता. कुत्रा याआधी कधी होडीत न बसल्याने त्याला हे सगळं नवीन होत. त्यामुळे तो अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला भुंकू लागला. त्याचा सहप्रवाश्यांना त्रास तर होऊ लागलाच पण होडी चालणारा नावाडी ही हैराण झाला. होडीत अशीच परिस्थिती राहीली तर नाव पलटू शकते. स्वःता तर बूडेन बरोबर सगळ्याना घेऊन बूडेल.
राज्याच्या लक्षात ही गोष्ट आली तो ही कुत्र्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला पण कुत्रा तो कुत्रा. तो पहील्यापेक्षा जास्त गडबड करू लागला.

      हे पाहून एक हुशार प्रवासी पुढे आला आणि राज्याला विनम्रपणे म्हणाला "महाराज, मला जर परवानगी दिली तर मी या कुत्र्याला गरीब मांजर बनवतो."
राज्याने होकार देताच त्या प्रवाश्याने तीन चार प्रवाश्यांच्या मदतीने कुत्र्याला उचलले आणि पाण्यात फेकून दिले.
कुत्र्याच्या काना तोंडात पाणी शिरू लागले श्वास घेणे मुश्किल झाले. शेवटी जिवाच्या आकांतने नावेचा आधार घेऊन तरंगू लागला. त्याला नावेची गरज लक्षात आली.
थोड्या वेळात त्याला ओढून नावेवर घेतले आणि तो चुपचाप एका कोपर्‍यात जाऊन बसला.
त्याने हे वर्तन पाहून राजा आश्चर्यचकीत झाला व म्हणाला " पहा. पहिलं किती त्रास देत होता आणि आता भित्र्या मांजरासारखा चुपचाप बसलाय."

      प्रवाशी हसून म्हणाला " महाराज, जो पर्यंत स्वताःला त्रास होत नाही तो पर्यंत दुसऱ्याच्या त्रासाची कल्पना येत नाही. त्याला जेव्हा पाण्यात फेकले तेव्हा त्याला स्वतःच्या जिवाची काळजी वाटू लागली आणि नावेची गरज."

      🌀❝ तात्पर्य ❞ ::~
    आपल्या नेहमी सोबत राहून आपल्यालाच ञास देतात. त्यांच्या पासुन दूरच राहीलेले बरे. असे मला वाटते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
           ● २०. सिंह लाडंगा आणि कोल्हा ●
             
    एकदा वनराज सिंह खूप आजारी पडला. त्याची प्रकृती विचारण्यासाठी सगळे पशू रोज येत असत, पण कोल्हा मात्र येत नसे. कोल्ह्याचे आणि लांडग्याचे शत्रुत्व होते. या गोष्टीचा फायदा घेऊन लांडग्याने सिंहास सांगितले की, 'महाराज, कोल्हा हल्ली आपल्या दरबारात नसतो. त्यावरून तो आपल्या विरुद्ध काही कपट-कारस्थान करत असावा असं मला वाटतं. हे ऐकून सिंहाने ताबडतोब कोल्ह्याला बोलावणे पाठवले व त्याला विचारले, 'काय रे, मी इतका आजारी असूनही तू मला भेटायला आला नाहीस, याचा अर्थ काय ?

    तेव्हा कोल्ह्याने उत्तर दिले. 'महाराज, मी आपल्याच करता एखादा चांगलासा वैद्य पहात होतो. कालच मला एका मोठ्या वैद्याने सांगितलं की नुकतंच काढलेलं लांडग्याचं कातडं पांघरलं असता, हा रोग बरा होईल.'

    सिंहाला ते खरे वाटले व त्याने कातड्यासाठी ताबडतोब लांडग्याला ठार मारले.

       🌀❝ तात्पर्य ❞ ::~
   दुसर्‍याच्या विनाशाची इच्छा करणारे लोक बहुधा स्वतःच नाश पावतात.

●●●●●●●●••••••••••••••••••••••••••••••••••••••

                              ❃ २१. कुत्रा व सुसर ❃
                          ••◆•◆•◆★◆•◆•◆••
     इजिप्तमध्ये नाईल नावाची मोठी* नदी आहे. त्या नदीत खूप सुसरी आहेत. एके दिवशी एक तहानेला कुत्रा त्या नदीजवळ पाणी पिण्यासाठी आला. तो कुत्रा नदीतील पाणी जेथे थोडे, तेथे थोडे असे पिऊ लागला.
      कुत्र्याचे असे पाणी पिणे पाहून त्या पाण्यातील एक सुसर आपले डोके पाण्यावर काढून त्याला म्हणाली, 'अरे, तुला फार घाई झाली आहे का ? तू एका जागी उभा राहून पाणी का पीत नाहीस ? तुझी ओळख करून घ्यावी अशी माझी फार दिवसांची इच्छा पुरी होत आहे. तुझ्या ओळखीने मला फार आनंद होतो आहे.'
     सुसरीचे हे बोलणे ऐकल्यावर कुत्र्याने सुसरीला उत्तर दिले, 'तुझ्या मैत्रीबद्दल मी तुझे आभार मानतो. पण खरंच बोलायचं झालं तर मी असा जो घाईघाईने पाणी पितोय तो तुझ्या सारख्यांची मैत्री होऊ नये म्हणूनच.

      🌀❝ तात्पर्य ❞ ::~
   वाईट स्वभाव असलेल्याशी आपला संबंध न यावा याबद्दल प्रत्येकाने जेवढी खबरदारी घ्यावी तेवढी थोडीच आहे.
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
                               ● २२.कोल्ह्याची फजिती●

            एकदा एक कोल्हा आणि मांजर शिकारी कुत्र्याबद्दल बोलत होते. कोल्हा म्हणाला, "मला शिकारी कुत्र्यांचा खूप राग येतो."
"मलाही येतो." मांजर म्हणाली.
      कोल्हा म्हणाला, "ते खूप वेगाने धावतात. पण ते मला पकडू शकत नाहीत. मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहित आहेत."
        "तू कोण कोणत्या युक्त्या करतोस?" मांजरीने विचारले.
"अनेक युक्त्या!" कोल्हा फुशारकी मारत म्हणाला, "कधी मी काटेरी झुडपातून धावतो, कधीकधी जंगलातल्या दाट झुडपात जाऊन बसतो, तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो, अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत."
मांजर म्हणाली, "मला तर फक्त एक चांगली युक्ती माहित आहे."
             "अरेरे! फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे?" कोल्हाने विचारले.
"बघच आता! आता मी तीच युक्ती करणारच आहे. ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत." असे म्हणत मांजर जवळच्याच एका झाडावर चढून बसली. तिथे ती शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहिली. शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला. कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले.
         मांजर मनात म्हणाली, "बिचारा कोल्हा ! त्याच्या अनेक युक्त्या पेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती."
●तात्पर्य :- कोणत्याही एकाच विषयात पारंगत व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
                       ● बोधकथा●
                      ●२३. स्वार्थी मांजर●
     एका मांजराने आपल्या मालकाचा आवडता पोपट मारून खाल्ला. तेव्हा मालकाने, "ते मांजर दिसले तर मारून टाकीन" असे रागाने म्हटले. ते ऐकताच मांजर इतके घाबरले की ह्या प्रसंगातून देवाने आपल्याला वाचविले तर पुढे आपण कोणताही पक्षी कधीही मारून खाणार नाही अशी प्रतिज्ञा केली. थोड्या वेळाने दिवाणखाण्याच्या खिडकीतून एक वटवाघूळ अचानक आत आले ते पाहून असल्या मोह उत्पन्न करणाऱ्या प्रसंगी कोणत्या प्रकारचे वर्तन करावे हा प्रश्न मांजराला पडला. एकीकडे भूक व दुसरीकडे प्रतिज्ञाभंग होण्याची भिती अशा पेचात ते सापडले असता काही वेळाने आपली भूक भागविण्याची एक युक्ती त्याला आढळून आली. वटवाघूळाकडे पाहून ते आपल्याशीच म्हणाले, "हा पक्षी आहे असं जर मानलं तर केलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे याला हात लावण्याचा अधिकार मला नाही, पण याच्या तोंडाचं उंदराच्या तोंडाशी इतकं साम्य आहे की, याला मारून खाण्याचा अधिकार मला आहे." इतके बोलून तिने त्या वटवाघूळाला खाऊन टाकले.
●तात्पर्य :- स्वार्थ साधण्याची वेळ आली असता लबाड लोक आपली प्रतिज्ञा युक्तीने गुंडाळून ठेवतात.

●●●●●●●●●●●●●●●●●
                       ●बोधकथा●
             ●२४. सवयीचा गुलाम... पोपट●
         एका माणसाने त्याच्या घरी एक पोपट पाळला होता. पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला चांगले खायला प्यायला मिळत असे व पोपट बोलका असल्याने घरातील लोकांकडून त्याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्य दाटून येई. अखेर एके दिवशी पोपटाला संधी चालून आली. त्या माणसाने पोपटाला खाणे देण्यासाठी पिंजऱ्याचे दार उघडले होते व नंतर मात्र त्याच्या हातून दार उघडे राहिले होते. त्या माणसाला अचानक काही काम आल्याने तो पिंजऱ्याचे दार उघडे टाकून निघून गेला. दार उघडेच म्हणून पोपट पिंजऱ्याच्या बाहेर निघून गेला.
पण लहानपणापासूनच पिंजऱ्यात राहिला असल्याने त्याला फारसे नीट उडताच येत नव्हते. एका झाडावर गेला असता त्याला इतर पोपटांशी बोलता येईना, कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्याने त्याला पोपटांची भाषा येत नव्हती म्हणून इतर पोपटही त्याला सहकारी मानत नव्हते. पिंजऱ्यात आयते खायची सवय असल्याने त्याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले. पोपटाला ऊनवारा पाऊस यांची कधीच सवय नसल्याने तो आजारी पडला व मरून गेला.
●तात्पर्य :- जास्त काळ पारतंत्र्यात (गुलामगिरीत) राहिल्याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते.

●●●●●●●●●●●●●●●●●●●
                          ● बोधकथा●
                     ●२५. अपमान व उपकार●
         एकदा दोन मित्र वाळवंटातून चाललेले असतात, रस्त्यात त्यांच्यात काहीतरी बाचाबाची होते आणि बाचाबाचीचे रुपांतर भांडणात होते. इतके कडाक्याचे भांडण होते कि एक मित्र दुसऱ्या मित्राच्या थोबाडीत ठेवून देतो. ज्याला थोबाडीत बसते तो दुसरा मित्र खूप दुःखी होतो, गप्प बसतो आणि वाळूमध्ये बोटाने लिहितो," आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला थोबाडीत दिली, ज्याला मी जीवापाड मैत्री करतो त्याने मला आज मारले." ज्याने थोबाडीत मारलेली असते तो हे पाहतो पण काहीच न बोलता दोघेही पुढे चालत राहतात.
      पुढे गेल्यावर त्यांना एक तलाव दिसतो, दोघेही जण पाण्यात उतरून स्नान करायचे ठरवतात, अंघोळ करता करता थोबाडीत खाल्लेला मित्र अचानक पाण्यात घसरतो, तिथे नेमकी दलदल असते, तो जोरजोराने ओरडायला सुरुवात करतो. ज्याने थोबाडीत मारलेली असते तो मित्र क्षणाचाही विचार न करता आपल्या मित्राच्या सहाय्याला धावतो आणि त्याला त्या दलदलीतून बाहेर ओढून काढतो. जेंव्हा तो बुडणारा मित्र पाण्याबाहेर येतो, अंग कोरडे करतो तेंव्हा तो एका दगडाने दगडावर कोरून लिहितो, "आज माझ्या प्राणप्रिय मित्राने मला मरणाच्या दारातून ओढून परत आणले, मी आज मेलोच असतो पण त्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून मला वाचविले." हे पण तो थोबाडीत देणारा वाचतो आणि त्याला राहवत नाही तो त्या मित्राला विचारतो कि, "पहिले मी तुला मारले तर ते तू वाळूत लिहिले आणि आता तुला पाण्यातून वाचविले तर ते तू दगडावर कोरून लिहिले हे असे का?"
         लिहिणारा मित्र म्हणाला, " जेंव्हा कोणी आपल्या हृदयाला, मनाला, भावनेला ठेच लावेल तेंव्हा ते सर्व काही वाळूत लिहावे कारण काही काळानंतर वाळू हि विस्कळीत होऊन जाते आणि मनातील भावनाही फार काळ एकसारख्या राहत नाहीत. पण जर कुणी उपकार केले तर ते मात्र दगडावर कोरून लिहिले कारण दगडावर कोरलेले जसे कायमस्वरूपी टिकून राहते तसे उपकार हे कायम लक्षात ठेवले जावेत."
●तात्पर्य :- "माणसाने अपमान तत्काळ विसरून जावा आणि उपकार आजन्म लक्षात ठेवावे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                         ● बोधकथा●
                      ●२६. कष्टाची कमाई श्रेष्ठ●

        एका नगरात दोन चोर राहत होते. प्रत्येक दिवशी ते चोरी करत आणि दोन हिस्से करून वाटत असत. एक हिस्सा स्वतःसाठी व दुसरा हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले. बरीच भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही. दोघेही थकून मंदिराच्या ओट्‌यावर बसले. तेथे त्यांना एक संत भेटले. संताने त्यांना परिचय विचारला तर त्यांनी स्वतः बाबत खरे सांगितले. हे ऐकून संत म्हणाला, तुम्ही जे करत आहात ते चांगले की वाईट आहे यावर कधी तुम्ही विचार केला आहे का? चोर म्हणाले, "
आम्ही करत आहोत ते चांगलेच असणार कारण चोरी करून आम्ही जे धन किंवा वस्तू प्राप्त करतो ते आम्ही दोन भागांमध्ये वाटतो. एक भाग आम्ही स्वतःकडे ठेवतो आणि दुसरा भाग ईश्वराला चरणी अर्पण करतो." तेव्हा त्या संताने आपल्या झोळीतून एक जिवंत कोंबडा काढला आणि त्यांना देत म्हणाला, "आज तुम्ही चोरी करू शकला नाहीत त्यामुळे निराश वाटत आहात हा कोंबडा ठेवा. याचे दोन हिस्से करा एक स्वतः साठी ठेवा आणि दुसरा ईश्वरचरणी ठेवा." दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संतांच्या बोलण्याचा आशय समजून म्हणाले, "महाराज इथून पुढे आम्ही चोरी न करता कष्टाची कमाई करून खाऊ आणि त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवू." दोघेही संताला नमस्कार करून निघून गेले.
●तात्पर्य :- चुकीच्या मार्गाने केलेली कमाई असंतोष आणि दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख, शांतता आणि आत्म्याला सुख देते.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●

                     ●बोधकथा●
                     ●२७. गर्विष्ठ मोर●
       एक मोर होता. तो फार बढाईखोर होता. स्वतःच्या रूपाचा त्याला फार गर्व होता. जायचा. पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहून, स्वतःच्या सौंदर्याची स्तुती करायचा.
मोर म्हणायचा, "माझा डोलदार पिसारा पहा! त्या पिसर्यावरील मोहक रंग पहा !! माझ्याकडे पहा ! जगातील सर्वात सुंदर पक्षी मीच आहे."
      एकेदिवशी मोराला नदीकिनाऱ्यावर एक करकोचा दिसला. मोराने त्याच्याकडे पाहून आपले तोंड फिरवले. आणि तुच्छतेने करकोच्याला म्हणाला, "किती रंगहीन आहेस तू! तुझे पंख पांढरे फटक आणि निस्तेज आहेत."
       करकोचा म्हणाला, "मित्रा, तुझा पिसारा नक्कीच सुंदर आहे. माझे पंख तुझ्या सारखी सुंदर नाहीत. पण म्हणून काय झालं? तुझ्या पंखांनी तू उंच उडू शकत नाहीस. मी मात्र माझ्या पंखांनी आकाशात उंच उडू शकतो." एवढे बोलून करकोचा ने आकाशात झेप घेतली. मोर मात्र खजील होऊन त्याच्याकडे पाहत राहिला.
●तात्पर्य :- दिखाऊ सौंदर्यापेक्षा उपयुक्तता महत्त्वाची असते.
●●●●●●●●●●●●●●●●●●

                           ● बोधकथा●
                      ● २८. समाधान खरे धन ●
   एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.'

    दुसर्‍या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.
●तात्पर्य:- जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे.

●●●●●●●●●●●●●●●●

                     ● बोधकथा●
                   ●२९. हरिण व कोल्हा●
       एका कोल्हयाला फिरण्याचा फार नाद होता, तो या गावाहून त्या गावाला सारखा फिरत राही, प्रवास करता करता तो एका गावाला आला. तिथे त्याला एका तलावात पाणी पीत असलेली काही हरणे दिसली. ती पाणी पितापिता मधेच अकाशाकडे पहात होती हे पाहून कोल्हयाने त्यांना असे करण्याचे कारण विचारले, तेव्हा हरणे म्हणाली, 'आम्ही देवाचे आभार मानतो देवाच्याच दयेनं हे पाणी प्यायला मिळतं आहे.' हरणांचे हे बोलणे ऐकून कोल्हयाला हसू आले व तो त्यांची टिंगल करू लागला. यावर त्यातले एक स्पष्टवक्ते हरीण कोल्हयाला म्हणाले, 'अरे कोल्होबा ज्याची त्याची श्रध्दा असते, अशी दुसऱ्याची टिंगल उडविणे वाईट आहे. आपले वागणे वाईट अशा विकृत दृष्टिकोन असलेल्या तुझ्याकडून समंजसपणाची अपेक्षा का करावी.'
●तात्पर्य :- दुसऱ्याच्या श्रध्देविषयी टिंगल करणे हे असभ्यपणाचे लक्षण आहे.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●


                ●बोधकथा●
               ●३०. कष्टाचे फळ●
       एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण, त्याची पाच मुले ही खूप आळशी होती. कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या मृत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल, म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे. ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा. शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण, शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले. त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन.
●तात्पर्य :- खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

No comments:

Post a Comment